Thursday, December 31, 2009

काही कविता... हरवलेल्या...

२. त्याच कप्प्यात एक १०० पानी, पुट्ठ्याची, 'सुपर डीलक्स' वही मिळाली. पहिल्या पानावर होत:
परिमेय संख्या
खालिल परिमेय संख्यांचे अंश व छेद लिहा. वगैरे...
आणि शेवटच्या पानांवर बऱ्याच कविता होत्या. त्यातली एक --

एकटा

मी इथे फक्त एकटा आहे.
ना आकाश, ना प्रकाश, ना अंधार, ना आधार

कुठल्याही झाडाच कुठलही पान
इथं सळसळत नाही
कुठल्याही बिलातल कुठलही गांडूळ
इथं वळवळत नाही

इथल्या शांततेला अस्तित्व नाही
आणि इथलं अस्तित्व अशांत आहे

वारा तरी इथे कधी येतो का? माहित नाही
पण तरीसुद्धा डोळ्यांतली आसवं वाळतात
आणि उन्ह तर इकडे कधीच येत नाही
कारण माझ्या सावलीशी त्याच वाकड़ आहे

पाउस... हं... इथल्या आकाशात ढगच नाहीत
वर पाहिल्यावर आकाश तरी कुठे दिसतं
बहुतेक ते नाहीचे इथे... केवळ भास... क्षितिजासारखा

मग तरीही मी इथे काय करतोय ?

की... कदाचित....

मी अजिबातच एकटा नाहीये इथं

कानाला जाणवणारही नाही, इतक्या
हलुवारपणे सळसळणारी इथली पानं
अन बेमालूमपणे माझी आसवं टिपणारा
इथला वारा

अस्तित्वहीन वाटणारी पण
क्षणोक्षणी माझ अस्तित्व पटवणारी
इथली निशब्द शांतता
आणि असीम शांत असलेला इथलं
अ-शांत अस्तित्व

बरोबर डोक्यावर पडणार आणि माझ्या सावलीला
सतत माझ्या नकळत माझ्या बरोबर ठेवणार
इथलं निरागस उन्ह

पटकन जाणवतही नाही
इतकं नितळ... इथलं आभाळ
आणि माझ्या इवल्या नजरे पलिकड़च
इथलं क्षितिज... विस्तृत, विशाल
माझ्या मनातलं मळभ घालवण्यासाठी
आसवांचा पाउस पाडणारे... इथले अदृश्य ढग

निरंतर, निराकारपणे गतिशील असलेला
इथला निशब्द, निर्गुण काळ

मी इथे काय करतोय ?

कदाचित... मी इथे एकाटेपणच शोधतोय
इथं अजिबात नसलेलं !

Wednesday, December 30, 2009

काही कविता... हरवलेल्या...

१. घरी वेळ जात नव्हता. म्हणून पुस्तकांचा एक कप्पा आवरायला घेतला. त्यात एक डायरी मिळाली. जिच्या पहिल्या पानावर, वाकड्या तिकड्या अक्षरात, उंची ४.८ अणि वजन २६ लिहिल होत. डायरी संपूर्ण कोरी होती. एक्सेप्ट शेवटच पान...

पुन्हा एकदा सापडलेल्या डायरीतली कविता...

संपूर्ण डायरी कोरी, शेवटी पान भरलेले
निर्बंध मोकळी पाने, शेवटी बंध जुळलेले

एखाद्या संध्याकाळी...

ना मेघ दाटलेले,
ना पश्चिम रंग बहरले,
ना वारा पिसाट सुटला,
ना माती अत्तर उधळे.


परी मनी मेघ दाटती,
उठती स्वप्नांचे बहुरंग
मन सैरावैरा पळते,
मन मनात त्याच्या दंग.


नकळत कशी पण तेव्हा, ती जूनी डायरी मिळते
मोकळ्या आणि त्या पिवळ्या, पानातून संध्या हसते...

Monday, September 21, 2009

खरच का एवढ्या सहज...

(आज रात्री)
असच कधीतरी मनात आलीये, एक छोटीशी कल्पना
आकाशाला साद घालण्याची तिची केवढी ही वल्गना
हे दोन-चार क्षण केवढ केवढ छान वाटलय...
खूप काही मनामध्ये काठोकाठ दाटलय
कसाही वेळ काढून आज लिहुयाच चार ओळी
सडा घालून आन्गणामध्ये कधी काढावी रांगोळी
log in करताना मात्र नेमका कामाचा मेल आला असतो
खरच का एवढ्या सहज आपण एखादा विचार हरवून टाकतो...

(मागच्या कुठल्यातरी आठवाड्यात)
आईशप्पथ..! केवढा भरी लिहितो हा... खूप खूप आवडलय
नकळत त्यानी मलादेखील स्वतःमध्ये ओढून घेतलय
काय लिहू रिप्लाय... काहीच सुचत नाहीये
'खूप छान' फक्त एवढच लिहीणसुद्धा पटत नाहीये
जाऊ दे... पुन्हा एकदा वाचून नंतर मस्तपैकी comment लिहीन...
मी ठरवून टाकतो
खरच का एवढ्या सहज आपण स्वतःमधून निसटून जातो

(आज रात्री उशीरा)
उशीर झालाय, झोप येतेय, नाही... आज लिहायचच
थोड तरी स्वतः आज स्वतःशीच बोलायचच
खूप दिवस झाले नाही मागची post टाकल्यानंतर
केवढे दिवस होतो स्वतः स्वतःशीच समांतर
वाचत का पण कुणी असल काही... comment तर कुठली दिसत नाहीये
बोअरही झालय आत्ता, विचार करावासा वाटत नाहीये
शनिवारी रात्री... नाही.. उद्या... उद्या मी नक्की लवकर घरी येतो
खरच का एवढ्या सहज... एखादा ब्लॉग मरून जातो.....

Thursday, April 30, 2009

मारव्यास...

"मारवा"

मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग !

...पु.ल.


मारव्यास...

कधी या शब्दांत सख्या, सूर तुझा अवतरेल
सरतील कधी अर्थ सर्व, भाव फक्त दरवळेल

वणवणेन जेव्हा मी, रणरणत्या वाटेवर
हेलाविन एकटाच, एकट्याच लाटेवर
आलापच आर्त कधी, अंतरात ओझरेल ?

सळसळेल वड जेव्हा, एकटाच माळावर
हळहळेल पडलेले, त्याचेच पान जमिनीवर
तगमग ती गमकातील, कधी गळ्यांत गहिवरेल ?

भगभगेल वणव्याचा, जेव्हा अंगार आत
झगमगेल अवसेची, अंधारी किर्र रात
धैवत तो अधीर कधी, काळजात धगधगेल ?

व्यापतील गगनाला, जेव्हा ते जलद गडद
जाणवेल खोल आत, कसलासा क्षीण नाद
कोमल तो ॠषभ कधी, नयनांतून ओघळेल ?

घोंघाविन जेव्हा मी, वाऱ्यागत आक्रंदून
डोकाविन एकट्याच, उंच उभ्या कड्यावरून
गंधित गंधार कधी, गात्रांतून गुणगुणेल ?

पिसाटेन मी जेव्हा, पाहून तो लखलखाट
हिरमुसेन पण आतून, झाली जरी भरभराट
अस्थिर तो षड्ज तुझा, कधी मनात हुरहुरेल ?

तळमळेन जेव्हा मी, बघत वाट एकटाच
अडखळॆन निघताना, कारण... मी एकटाच
तुझा निषाद जणु विषाद, रक्तात कधी विरघळेल ?

शहारेल मन जेव्हा, सत्याने ढळढळीत
थरथरेल कोपऱ्यात, एकटीच सांजवात
मध्यम तो तीव्र तीर, कधी उरात कळवळेल ?

कधी या शब्दांत सख्या...

... स्वानंद

Monday, April 27, 2009

आशाच एका संध्याकाळी...

अशाच एका संध्याकाळी ... !!!

इकडे ना उंच इमारती नाहीत... इकडून दिसतं तेवढं अथांग आकाश फारसं कधी पाहिलच नव्ह्तं... आअकाशाचे निळे तुकडे दिसायचे मधून मधून... अर्थात... एवढेच लोभस...
पश्चिमेला एक मोकळा माळ आहे... दिड वर्षापुर्वी होता तेवढा मोकळा न ठेवण्याचं ’कर्त्वव्य’ इथल्या माणसांनी केलंय... पण अजूनही, क्षितिजाला टेकणारा तो लाल, तांबूस, सोनेरी सूर्य दिसतो इथून... आत्तापर्यंत क्षितिजाला टेकलेलं सूर्यबिंब फक्त फोटोतच पाहिलेलं... त्याची विशालता, त्याचं ते दिव्यत्त्व... त्या गगनराजाचं राजवैभव ’अनुभवलं’ ते इथंच...
क्षितिजापल्याडच्या त्या दूर जाणाऱ्या वाटेवरची मोहक संध्या... वाऱ्याने विस्कटून टाकलेल्या वाकड्या तिकड्या ढगांवर सोनेरी कवडसे पडले की त्या रंगोत्सवात संध्येचा सुंदर चेहेरा उजळून निघतो... केवढा निष्पाप... केवढा मोहक...!!! आणि मधेच कोठुनसा उडाणारा पक्षांचा एक थवा... जणु दृष्ट लागू नये म्हणून लावलेलं गालबोट...! एखाद्या छानशा चित्रालही लाजवेल असा हा असंख्य रंगांचा सोह्ळा... स्वतःच्या वेगळ्याच रंगात न्हाऊन निघलेला...
पण मग संध्यकाळच का? सकाळी सुद्धा किती छान असतं नाही?... शांत, थंड हवेत, हळूवार वर येणारा सूर्य तेवढाच मनोहर दिसतो की... उलट ही तर सुरुवात...! एका वेगळ्याच, आभासी दुनियेत अलवार घेऊन जाणारी ही प्रभा...
आहो, पण इथं वेळ कोणाला आहे सकाळी सकाळी असले विचार करायला... लेक्चर्स, लॅब, ऑफिस, असाईन्मेण्ट्स, एक्झाम्स... इथे टेन्शन्स काय कमी आहेत... एखादा दिवस ’आजपासून नियमित अभ्यास’ असं ठरवावं आणि केवळ तिसऱ्या स्नूझला उठावं (!) तर... तर आकाश काळ्या ढगांनी भरलेलं... पावसाळा जवळपासही नसताना उगाचच दाटून आलेलं मळभ... उगाचच उदास, भकास वाटणारं... सगळा मूड डाऊन... होतोय आता ’नियमित’ अभ्यास... पाऊस तर नाहीच पडणार बहुतेक... आणि पडलाच तर नेमका लेक्चरला जाताना पडणार... छे... काय भिक्कार हवा पडलिये...
आणि संध्याकाळी सुद्धा कुठलं आलयं ते सोनेरी सूर्यबिंब वगैरे... एकतर ऑफिसमध्ये काम करून दमलेलो, नाहितर लेक्चर्सना झोपून कंटाळलेलो... मस्त चहा प्यायचा आणि रूमवर जाऊन ऑर्कूट... जरा टि.पी. टाईम...
पण मग... मग कधीतरी एखाद्या स्वच्छ सकाळी, का उगाच आपल्याच मनात मळभ दाटून येतं... त्याची ती उदासीनता कुठेतरी खोलवरून आतून येतेय असा काहीतरी मॅड फील येऊ लागतो... आणि एखाद्या वेडया क्षणी... उगाच, क्षणभरच, डोळे भरून आलेत कि काय असं वाटतं... केवढ मॅड..!!! (’वनवास’ मधल्या लंपन सारखं मॅड वाटणं!) आणि का एखाद्या ढगाळलेल्या संध्येला मनात अनेक रंगांचे कवडसे पडतात... सगळं कसं छान, आनंदी... एखाद्या उन्हानी मारून टकणाऱ्या दुपारी, एखादं इवलं फुलपाखरू स्वप्नांच्या वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं... संध्याकाळी कितीही दमलं असलं तरी निवांतपणे झाडाच्या शेंड्यावर पहुडलेलं सोनेरी उन्ह तितक्याच निवांतपणे डोळ्यांत साठवावसं वाटतं... ग्रीष्मातल्या एखाद्या रात्री, फक्त उकडून जीव जातोय म्हणून, टेरेसवर गेल्यावर... जस्ट उगवलेला... पिवळसर, खडबडीत चांदोबा केवढा भावतो...
इतकंच काय... चालू असलेल्या लेक्चरमध्ये किंवा आऊटपूट न येणारा प्रोग्राम डिबग करून फ्रस्ट झालो असताना... उगाचच कुठल्याश्या कोपऱ्यात नजर स्थिरावते... आणि मन... मन त्याच्याच कुठल्याश्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणींच्या किंवा कल्पनांच्या प्रकाशाशी वेगानं स्पर्धा करू लागतं...
भाव दाटू लागतात... कोठून कोण जाणे पण नकळत शब्दही येतात... ’स्फुरणे’ की काय म्हणतात ना तसलं काहीतरी... कधीही... कुठेही...! आणि जितक्या सहज काहीतरी स्फुरतं ना तितक्याच सहज मॅडसारखं ते मनातच विरून जातं... बऱ्याचदा...!!
पण कधीतरी... कधीतरी ती कुठली तरी जाणीव, कसलीशी भावना... सारं मन व्यापून टाकते... आणि ती अथांग खोलीही जेव्हा पूरत नाही तेव्हा सहजपणे कागदावर उतरते... हळूवार, अलगद... तिच्या तिलाच जाणवणाऱ्या असंख्य रंगांबरोबर... आणि मनातच होते एक सुंदरशी संध्याकाळ... कुठेही... कधीही...!!!

आशाच एका संध्याकाळी...